Followers

Sunday 22 October 2023

विदर्भातील शक्तीपीठ ३७ - महाकाली, चंद्रपूर

 

#VidarbhaDarshan :




विदर्भातील शक्तीपीठ ३७ - महाकाली, चंद्रपूर
महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही . विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर . या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात . मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो . वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते . विदर्भ , मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते . महाकालीची ही यात्रा ' नांदेडची यात्रा ' म्हणूनही ओळखली जाते . चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात . महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते . या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात . हे गुफा मंदिर आहे . रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य . अजिंठा - वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही .
येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुफेकडे आला . तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले . त्याचे व्रण नाहीसे झाले . पुढे त्याला स्वत : महाकालीने दृष्टांत दिला . स्वत : चे स्थान सांगितले . दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला . गुफा मोकळी केली . त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली . राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले . आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली . १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ . देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह ( बिरसिंग ) यांच्यात लढाई झाली . वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता . अचानक ' जय महाकाली ' चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ - १७१९ ) कर्तृत्ववान होती . मदनापूर होशंगाबाद येथील मोगल सरदार ढिल्लनसिंग मडावी यांची ती मुलगी . कुशाग्र बुद्धीची हिराई शस्त्रविद्येत पारंगत होती . गोंडराजा किसनशाह याने हिराईतील गुण ओळखले होते . त्यामुळेच त्याने तिला आपला मुलगा वीरशाह याच्यासाठी मागणी घातली . १७०४च्या सप्टेंबरमध्ये राजा वीरशाहची हत्या झाली . वयाच्या २२ - २३व्या वर्षी हिराईला वैधव्य झाले . जबाबदारी आली . गादीला वारस नव्हता . राणीने तीन वर्षांच्या रामशाहला दत्तक घेऊन नेटाने राज्यकारभार सुरू केला . आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत , याची तिला जाणीव होती . तिच्या काळात पाच मोठी युद्धे झाली . या युद्धांमध्ये राणीचे युद्धकौशल्य दिसले . मुत्सद्देगिरीही जाणवली . तिचा पराभव झाला . अर्धे राज्य गेले . पण ती खचली नाही . ती जितकी युद्धनिपूण , तितकीच धार्मिक वृत्तीचीही होती . महाकाली मंदिरासोबतच अंचलेश्वर , एकवीरा , खटीचा गणपती मंदिर , मुरसा येथील शिवमंदिर , गिलबिली येथील महादेव मंदिर , वैरागड येथील भवानी मंदिर तिनं बांधली . मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर मंदिर दुरुस्त केले . वीर पतीची आठवण कायम राहावी , म्हणून राजा वीरशाह याची मोठी समाधी हिराईने बांधली . आज मात्र ही समाधी दुरवस्थेत आहे .
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे . रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य . हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत . महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत . आतील भागात कमानी आहेत . बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान , राजा - राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत . एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे . एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते . आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ , दोन सैन्यांतील युद्धप्रसंग , नमस्कार करीत असलेले भक्तगण , घोडेस्वार , गजस्वार , उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर सांगतात , ' चवथ्या - पाचव्या शतकात हे गुफा मंदिर होते . ते वाकाटक काळातील असावे . चंद्रपूर जिल्ह्यात अशा अनेक गुफा आढळतात . या मंदिराची स्थापत्यरचना ही गोंड - भोसलाशैलीची आहे . राज्य सार्वभौम आणि संपन्न असले की स्थापत्यरचना तयार होतात . त्यात त्या - त्या शासकाचे प्रतिबिंब उमटते . चंद्रपूरमध्ये गोंडांचा शासनकाळ साधारणत : ५५० वर्षे होता . पण बहुतांश काळ ते मोगलांचे मांडलिक होते . आताच्या महाकाली मंदिरात राणी हिराईच्या कल्पकतेचा प्रभाव दिसतो .
या आदिशक्ती महाकालीच्या यात्रापरंपरेविषयीही आख्यायिका आहेत . एका प्रचलित आख्यायिकेनुसार , नांदेड जिल्ह्यातील तळेगाव उमरी येथील राजाबाई देवकरीण ही धार्मिक वृत्तीची स्त्री . ती आदिशक्तीची उपासक होती . १९०५ - ०६च्या दरम्यान चंद्रपूरची आदिशक्ती देवी महाकाली ही राजाबाई देवकरीणीच्या स्वप्नात आली . ' मी चंद्रपूर परगण्यात आहे . तेव्हा तू माझ्या भक्तीचा प्रसार कर ', अशी आज्ञा तिला दिली . देवीची आज्ञा स्वीकारून राजाबाई आपल्या भागातील लोकांचा एक जत्था घेऊन चंद्रपूरला महाकाली देवीच्या दर्शनास आली . दर्शन घेऊन गावी परतली . तेव्हापासूनच या देवीच्या यात्रेला नांदेडसह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने येऊ लागल्याचे सांगितले जाते . चैत्र शुक्ल षष्ठी ते पौर्णिमेपर्यंत ही यात्रा चालते . यात्रेच्या नऊ दिवसांत देवी व्रतस्थ असते . वरण , भात , पोळी असा नेवैद्य देवीला दिला जातो . दहीदुधाचा अभिषेक केला जातो . पुरणाच्या आरतीनंतर घट हलविला जातो . त्यानंतर भक्त नारळ फोडतात . पोतराज हे या यात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात . आली आली या महाकाली। तिचा कळेना अनुभऊ। साऱ्या जगाला घालते खाऊ। माय माझी काली।। अशी लोकगीते म्हणत भक्त महाकाली देवीचा महिमा गातात . देवीचे भक्त देवकर व देवकरीण आंबिल घेतल्याशिवाय जात नाहीत . या मंदिराचे पुजारीपण दिवंगत नामदेवराव गोविंदराव महाकाले यांच्याकडे आले . गेल्या १३ पिढ्यांपासून त्यांच्या वंशजांकडे ही परंपरा सुरू आहे . गोंडकालीन इतिहास आणि अध्यात्माची परंपरा असा दुहेरी संदर्भ असलेले हे महाकाली मंदिर विदर्भाचीच नव्हे तर मध्य प्रांताची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.

No comments:

Post a Comment