Followers

Wednesday 21 July 2021

किल्लेकोट व तटबंदी

 


किल्लेकोट व तटबंदी
-

 देशाच्या किंवा प्रांताच्या रक्षणार्थ किल्ला अगर गड वगैरे बांधण्याची चाल बरीच जुनी आहे. वेदांमध्येंहि किल्ले या अर्थी पुर शब्द योजिला आहे; (ज्ञानकोश विभाग ३ पृ. ३४७ पहा). त्यावरून वेदकालीं किल्ले असावेत असें दिसतें. रामायणांत तर लंकेचें वर्णन देतांना तिच्या तटबंदीचें, बुरुजांचें, वेशींचें वगैरे किल्ल्याच्या स्वरूपाचें वर्णन दिलेलें आहे; त्यामुळें रामायणकाळीं किल्ल्याची कल्पना चांगलीच अस्तित्वांत होती असें ठरतें. रामायणांतील सुवेळा, निकुंभिला, किष्किंधा हीं ठिकाणें तटबंदीचीं होतीं. महाभारतांतील कूटयुद्धाच्या वर्णनांत; किल्ल्यांचा उपयोग सांगितला आहे, तो असा: - “राजानें प्रथम आपल्या मुख्य दुर्गाचा आश्रय करावा; श्रीमंत लोक जेथें किल्ले असतील तेथें आणून ठेवावें व तेथें फौजेंतील पाहारे ठेवावे; किल्ल्याभोंवतालचें सर्व जंगल तोडून टाकावें; किल्ल्यावर टेहळणीच्या उंच जागा कराव्या व मारा करण्यासाठीं संरक्षित जागा व छिद्रें करावीं; किल्ल्यांतून बाहेर पडण्याचे गुप्त रस्ते असावेत; दरवाज्यावर यंत्रें व शतघ्री रोंखून ठेवाव्यात; नवीन विहिरी पाडाव्यात; रात्रींच फक्त अन्न शिजवावें” (शांतीपर्व अ. ६९). श्रीकृष्णाच्या द्वारकेला तटबंदी फार उत्कृष्ट होती; जरासंघाच्या राजधानीसहि तशीच होती. त्याच्या राजधानींत कृष्ण, भीम व अर्जुन या तिघांनीं प्रवेश केला तो तटावरून चढून केला व तटावरील दुंदुभी फोडल्या असें त्या वेळचें वर्णन आहे. द्वारकेवर शाल्वानें हल्ला केला त्यावेळच्या वर्णनांत तट, बुरुज, मोर्चे वगैरेंचा उल्लेख येतो. चाणक्याच्या अर्थशास्त्र त किल्ल्याचें महत्व वर्णिलेलें आहे. राज्याच्या सरहद्दीवर प्रत्येक दिशेस मजबूत किल्ले असावेत असें त्यांचें म्हणणें आहे. त्यानेंहि औदक (जंजिरा), पार्वत (गड), धानवन (भुईकोट) व वनदुर्ग असे प्रकार सांगितले आहेत. किल्ल्यांचे आकार गोल, लंबचौरस व चौरस असून भोंवतीं खंदक, नदी किंवा कालवे असावेत; खंदक एकापुढें एक असे तीन ठेवून त्यांतील अंतर ६ फूट व खंदकाची रुंदी १०, १२, १४ फूट असावी व खोली रुंदीच्या निम्मी असावी; खंदकांत सुसरी, मगर व कमळाचे वेल असावेत (यांची गुंतागुंत फार असते, त्यामुळें या वेलांत माणूस अडकल्यास लवकर बाहेर पडत नाहीं). तट व पहिला खंदक यांत २४ फूट अंतर ठेवून, तटाची उंची ७२ फूट व रुंदी ३६ फूट ठेवावी आणि पायथ्याशीं निवडुंग व कांटेरी झुडपांची लागवड करावी व पुढें खड्डे, उंचवटे ठेवावेत. तटावर १२ हातांगणीक जंग्या ठेवाव्यात. बुरुज चौकोनी असावेत (ख्रिस्तपूर्व व ख्रिती शकांतील पहिल्या काळच्या रोमन व ग्रीशियन किल्ल्यांचेहि बुरुज चौकोनी होते असें त्यांच्या चित्रांवरून दिसतें.) किल्ल्यांत तटाइतकी उंच अशीं एक शिडी तयार करून ठेवावी. दोन बुरुजांत अंतर १८० फूट असावें. तटावरील मार्ग झांकलेला असावा. या मार्गावर इंद्रकोष म्हणून झांकलेल्या उंच बैठका असाव्यात. (यावरून बहुधां तोफांचा अगर बाणांचा मारा शत्रूवर करीत असावेत.) तटात एक गुप्त जिना व एक बाहेर पडण्याचें गुप्त द्वार व एक विहीर असावी (याचें प्रत्यक्ष उदाहरण पुण्याच्या शनिवारवाड्याच्या दक्षिणेच्या पहिल्या बुरुजांत दृष्टीस पडतें). किल्ल्याच्या महाद्वाराला हत्तीनें तें फोडूं नये म्हणून २४ अंगुळांचे अणकुचीदार लोखंडी इंद्रकील (खिळे) असावेत. त्याला चार अडसर असावेत, दाराची रुंदी ५ हात असावी. दारावर एक मनोरा (नगारखाना?) सुसरीच्या आकाराचा असावा. किल्ल्यात एकंदर बारा वेशी असाव्यात. तटाच्यावर कुमारीदेवीचें एक देऊळ असावें व पाण्याचे लहान लहान पाट व एक कमळानें भरलेलें कुंड असावें. या पाटांत (लपवून ठेवण्यासाठीं?) शस्त्रें ठेवावीं; तीं म्हणजे कुदळी, कुर्‍हाडी, दगड, मुद्गर, सोटे, चक्र, यंत्रें, शतघ्नी (तोफा), भाले वगैरे. किल्ल्यांत इमारती बांधतांना प्रथम पूर्वपश्चिम व दक्षिणोत्तर असे तीन तीन राजमार्ग चोवीस फूट रुंदीचे तयार करावेत. फौजेसाठीं जे रस्ते असतात त्यांची रुंदी ४८ फूट ठेवावी. किल्ल्यांत मजबूत जागीं चारी बाजूंस इतरांचीं घरें ठेवून उत्तरदिशेस उत्तराभिमुखी अगर पूर्वाभिमुखी किल्ल्यांतील सर्व जमीनीचीं १/९ जमीन व्यापणारा असा राजवाडा बांधावा. पुरोहित, यज्ञशाळा, पाण्याचा खजिना, प्रधानांचीं घरें, मुदबकखाना, गजशाला, कोठी हीं राजवाड्याच्या डावीकडे असावीं. व्यापारी, कारागीर, योद्धे, खजीना, खजीनदारकचेरी, इतर अठरा कारखाने, दारुगोळ्याचें कोठार, सेनापतींचे घर वगैरे राजवाड्या या उजवीकडे असावी. यांच्या शिवाय उष्ठ्रखाना, रथशाळा, अश्वशाळा, शस्त्रशाळा, दवाखाने, दुकानें, गोशाळा, राज्याची कुलदेवता (तिथें देऊळ) वगैरे इमारती किल्ल्यांत असाव्यात. वेशींचीं नावें ब्रह्मा, इंद्र, यम, सेनापति अशीं असावीं. प्रत्येक दहा घरास एक विहीर खोदावी. सरकारी लष्करी अधिकारी, निरनिराळ्या खात्यांवरचे अनेक (एकाच खात्यांत अनेक) असावेत. तसे असले म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर दाब असतो व ते सहसा फितूर होत नाहींत. किल्ले घेतांना सुरुंगाचा उपयोग करावा खंदक भरून काढून हल्ले करावे ज्यांचीं घरटीं किल्ल्यांत असतील अशा पक्ष्यांनां पकडून त्यांच्या शेंपट्यांस स्फोटक द्रव्यें बांधून त्यांनां आंत सोडावें. तसेच किल्ल्यांत नौकर म्हणून आपले लोक ठेवावेत अगर फितूर करून त्याच्याकडून मुंगूस, वानरें माजरें, कुत्रीं यांच्या शेंपट्यांनां स्फोटके द्रव्यें बांधवून आंतील गवती छपरांच्या घरावर सोडावीं. (येथें स्फोटक द्रव्यांच्या गोळ्यांत कोणतीं द्रव्यें कशीं घालून गोळे तयार करावेत तें चाणक्यानें दिलें आहे) व अग्नीचे बाणहि सोडावेत. यापुढें हल्ले कसे व केव्हां करावेत, फितूर कसा करावा व किल्ला काबीज केल्यावर काय करावें यासंबंधानेंहि चाणक्यानें बरेंच विवेचन केलें आहे.

मध्ययुगांत कालंजर, कनोज, मान्यखेत दिल्ली मयुरखण्डि, कपिश, त्रैकूटक, उज्जनी, राजगृह वगैरे किल्ले अगर तटबंदीच्या राजधान्यांचीं नांवें आढळतात. राजपुतान्यांतील प्रसिद्ध चितोडगड याच्या नंतरच्या काळात बांधला गेला. मुसुलमानी अंमलाच्या प्रारंभीं उत्तर हिंदुस्थानांत प्रख्यात किल्ले थोडे होते. मुसुलमानी अंमल झाल्यानंतर व त्याचें आणि रजपुतांचें व इतर हिंदूचें युद्ध जुंपल्यानंतर राजपुताना, पंजाब, काश्मीर, बंगाल, बहार व ओरिसा इकडे किल्ले जास्ती बांधले गेले. उत्तरहिंदुस्थानांत डोंगर थोडे असल्यानें डोंगरी किल्ले फार थोडे असून भुईकोट, किल्लेच फार आहेत. दक्षिणेंत तसे नाहींत. इकडे सह्याद्री, सातपुडा, चांदवड वगैरे डोंगर असल्यानें बहुतेक किल्ले डोंगरीच होते आणि त्याचमुळें मुसुलमानांनां जितक्या लवकर सपाट उत्तरहिंदुस्थान जिंकितां आला, तितका डोंगराळ दक्षिणहिंदुस्थान जिंकितां आला नाहीं व जरी जिंकिला तरी सतत तो त्यांच्या ताब्यांत राहिला नाहीं. दक्षिणेंतील-त्यांतल्या त्यांत महाराष्ट्रांतील- किल्ले फार बळकट असत. भोजराजांनीं, शिलाहारांनीं व चालुक्यांनीं हे किल्ले बांधिले होते. सिंहगड, पन्हाळा, विशाळगड, सातारा, माहुली, तोरणा वगैरे प्राचीन किल्ले असून शिवाजीमहाराजांनीं व इतर मराठी राजसत्ताधार्‍यांनीं अनेक नवीन किल्ले बांधिले.

डोंगरी व भुईकोट या किल्ल्यांच्या दोन प्रकारांप्रमाणेंच जंजिरा- पाणकिल्ला-हाहि एक तिसरा प्रकार होता. शिवछत्रपतीनें सिंधुदुर्ग हा प्रख्यात पाणकिल्ला बांधिला होता. त्यास मराठे ‘शिवलंका’ असें मोठ्या अभिमानानें म्हणत. मराठ्यांनीं अर्नाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, अलिबाग व हबशानें जंजिरा हे किल्ले बांधल्याचें प्रसिद्धच आहे. हे जलदुर्ग फार थोडे होते. मराठी राज्यांतील या जलदुर्गाचें व आरमाराचें आधिपत्य प्रथम आंग्रे व नंतर धुळप या सरदारांकडे होतें.

राज्यव्यवहारकोशांत दुर्ग, गड व जंजिरा असे तीन प्रकार सांगितले आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठीं तट बांधीत. तटास मधून मधून मजबुतीसाठी व युद्धोपयोगी सामान ठेवण्यासाठीं बुरुज बांधीत. या बुरुजांनां व तटाला भोकें (यांना जंगी म्हणत) ठेवून त्यांतून शत्रूंवर बंदुकांच्या गोळ्या सोडीत असत. बुरुजांवर तोफा असत. कांहीं किल्ल्यांनां दोन दोन तट असून किल्ल्याच्या आंत बालेकिल्ला असे. किल्ल्याच्या निरनिराळ्या भांगांना फांजी, रेवण, पडकोट, चर्या, जीभ, अर्गळा, मेट, सफैली वगैरे नांवे असत. तटाच्या पुढें (भुईकोट किल्ला असल्यास) खंदक असे, खंदकावर एक लांकडी पूल असे; त्यास साकू म्हणत. किल्ल्यांत धान्य साठविण्याचीं कोठारें, पाण्याचीं टांकीं, विहिरी, पागा, रहाण्याच्या कोठड्या, राजवाडा, दारूगोळा ठेवण्याचा बारुदखाना वगैरे जागा असत.

भुईकोट किल्ले गंगा व सिंधुनदीच्या कांठीं बरेच आहेत. दिल्ली, आग्रा, प्रयाग, भरतपूर वगैरे कल्ले विस्तारानें फार मोठे व मजबूत आहेत, पण ते सारे भुईकोट आहेत. यांच्या भोंवतीं खंदक अगर नद्यांचें पात्र आहे. आग्र्याच्या किल्ल्यांत राजवाडे दिवाणई-खास व आम आणि मशिदी वगैरे आहेत. विजापूरच्या आर्क किल्ल्यांतहि अद्यापि मोठमोठे पडके राजवाडे पहावयास सांपडतात. हाहि भुईकोटच आहे. किल्ल्याचें महाद्वार ओलांडल्यावर,  दुसरी वेस जी असे ती उजवी अगर डावीकडे ठेवीत; महाद्वाराच्या समोर केव्हांहि ठेवीत नसत. किल्ला एकाएकीं हस्तगत होऊं नये म्हणून ही खबरदारी असे. रस्तेहि नागमोडी व त्यावर तोफा रोखलेल्या असे असत. खंदकाच्या पुढें कांटेरी निवडुंग अगर बांबूंचीं बनेंहि लावीत असत. त्यामुळें शत्रूंच्या तोफेचा मारा निकामी होई.

किल्ल्याच्या खालील १०।१५ कोसांचा भोंवतालचा मुलूख त्या किल्ल्याच्या दिमतीस असे. त्या प्रांताचा वसूल किल्लेदारानें गोळा करून आपल्या (किल्ल्याच्या फौजेच्या व इतर) खर्चाइतका ठेऊन घेऊन बाकीचा मुख्य सरकारकडे पाठविण्याची चाल असे. किल्ल्यावर मुख्य किल्लेदार हा असून त्याचे हाताखाली जामदार, कारखाननीस, हवालदार, मुजुमदार, सबनीस वगैरे लष्करी व मुलकी अधिकारी असत. किल्ल्याच्या महत्वाप्रमाणें कमजास्ती फौज असे. किल्ल्यामुळें शत्रूंपासून बचाव व शत्रूला अडथळा या दोन्ही गोष्टी करितां येतात. तोफा निघण्यापूर्वी (बाणाच्या युद्धकालांत) डोंगरी किल्ल्यांचें महत्व फार असे, कारण बाणांचा मारा इतक्या उंचीवर जात नसे. परंतु हल्लीं लांब पल्ल्याच्या प्रचंड तोफा व अगदीं अलीकडे निघालेलीं विमानें यांच्यापुढें या भुईकोट व डोंगरी किल्ल्यांचें महत्व फारसें राहिलें नाहीं हें परवांच्या यूरोपीय महायुद्धांत सिद्ध झालेंच आहे. तोपर्यंत जगांतील अजिंक्य समजले जाणारे नामूर, अँटवर्प, मेत्झ, वगैरे किल्ले जर्मन लोकांनीं हाविट्झर तोफांच्या व विमानांच्या साहाय्यानें अगदीं अल्पावधींत काबीज केले. सारांश, यापुढील काळांत किल्ल्यांचें महत्व कमी होत जाईल असें दिसतें.

किल्ला बांधितांना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात;  लढायांत उपयोगांत येणारीं हत्यारें, जमीनीची पहाणी, शत्रूची व आपली ताकत, पाण्याची व दाण्याची सोय, चोर मार्ग वगैरे लक्ष्यांत न घेतल्यास फार दिवसांच्या वेढ्यानें आंतील लोकांचें नुकसान होतें. किल्ले बांधण्यापूर्वीं नुसता तटह गांवाभोंवतीं घालीत. आशा प्रकारें निनेव्ही आणि बाबिलोन येथील तटबंदी होती. मात्र ती फक्त संरक्षणाच्या (बचावाच्या) स्वरूपाची होती. शत्रूस तोंड द्यावयाचें झाल्यास आंतील सैन्यास या तटाबाहेर जावें लागे. चीनमधील प्रचंड भिंतहि तटबंदीचें एक अलौकिक उदाहरणच होय. हिंदुस्थानांत व यूरोपमध्येंहि मध्ययुगांत जहागीरदार व सरंजामदार हे लहान लहान गढ्या बांधून आपल्या जहागिरींचे (त्यांतील रस्ते, नदीचे उतार, पूल वगैरे) संरक्षण करीत असत. तोफा उपयोगांत आल्यानंतर १७ व्या व १८ व्या शतकांत या यूरोपियन जमीदारांच्या गढ्यांचें महत्व संपलें. आपल्या इकडे महाराष्ट्रांत खुद्द शिवाजी महाराजांनीं, हे जमीदार गढ्या बांधून शिरजोर होतात म्हणून, त्यांच्या गढ्या पाडून टाकिल्या. मध्यवर्ती सरकारास या बंडखोरांपासून त्रास होतो म्हणून त्यांनीं कोण्याहि इनामदारास गढी बांधूं दिली नाहीं. हल्लीं लष्करीदृष्ट्या नाजूक व महत्वाचीं ठाणीं जेथें असतील तेथें किल्ले बांधितात. उदाहरणार्थ राजधानी, लष्करी, कोठारें, दर्यावरील गोद्या, आगगाड्याचीं जंक्शनस्टेशनें वगैरे.

किल्ल्यांच्या कल्पनेपूर्वी प्रथम कांट्याचीं कुंपणें गांवाभोंवतीं ठेवीत असत. शिकंदराने हिरक्यानिअन लोकांच्या खेड्यांभोवतीं असलीं कुंपणें असल्याचें लिहिलें आहे. हल्लीं अरबस्तानांत व हिंदुस्थानांत कर्नाटकांत निवडुंगाचें कुंपण असलेलीं खेडीं आढळतात. यानंतर मातीचा तट बांधण्याची युक्ती निघाली. जर्मनींत मध्ययुगांत हे तट मातीचे होते. आपल्याकडे जुने तट नुसत्या मातीचे बांधलेले कोठें कोठें आढळतात. यांत तोफेचा गोळा घुसला तरी (दगडी बांधकामाच्या तटापेक्षां) फारच थोडें नुकसान होतें. भरतपूरच्या किल्ल्याचा प्रसिद्ध तट व कुंभेरीचा तट मातीचाच आहे असें म्हणतात. मातीच्या भिंतींनंतर दगड विटांचा बांधीव तट उपयोगांत आला. तट उंच (म्हणजे शत्रूस शिड्या लावितां येऊं नयेत इतका) व रुंद (म्हणजे आपल्याला त्यावर सामानासह सुलभतेनें फिरतां येईल असा) असावा. तटानंतर बुरुज प्रचारांत आले. यांचा उपयोग शत्रूंवर मारा करण्यास होई मागें सांगितलेल्या निनेव्हीचा तट १२० फूट उंच व ३० फूट रुंद व १५०० बुरुजांचा असून तो खि. पू. २ हजार वर्षांपूर्वीं बांधलेला होता. असल्या तटांना शिड्या लावून किल्ले काबीज करीत. तें नच जमल्यास तटास सुरुंग लावीत व तट उडवून देत. क्वचित (सिंहगडसारख्या) प्रसंगीं घोरपडीचाही उपयोग करीत; अगर सभोंवार मोर्चें देऊन सतत तोफांचा मारा करून तो जमीनदोस्त करीत असत. यरुशलेमवर झालेल्या ख्रि. पू. ८ व्या व ६ व्या शतकांतील शत्रूच्या हल्ल्यांत ३०० शेर वजनाचे दगडे गोळे फेंकणारीं यंत्रें, तोफा, झुलते घण यांचा उपयोग केला होता. रोमन लोकांनीं ही कला ग्रीक लोकांपासून घेतली. रोमन किल्ले बहुधा उंच ठिकाणीं बांधिलेले असत. याचें कारण त्याचे तट २० फूट रुंदीचे असत; त्यावेळचीं तटबंदीचीं कांहीं वर्णनें आढळतात. कारकासोने येथील बुरुज, गैलार्ड येथील किल्ला, माँटार्जीसचा किल्ला यांचीं प्रत्यक्ष पाहून लिहिलेलीं वर्णनें आहेत; त्यावरून त्यांच्या बांधणीची कल्पना येते. यानंतर १५ व्या शतकांत जेव्हां तोफांचा व दारूगोळ्याचा प्रचार सुरू झाला तेव्हां किल्ल्यांच्या प्राचीन बांधणींत फरक पडूं लागला. यूरोपांत प्रथम फ्रान्समध्यें या शस्त्रांचा मारा करण्यास सुरुवात झाली. स. १४२८ त इंग्रजांनीं आर्लिअन्सला घातलेल्या वेढ्यांत किल्लेदारांनीं तोफांच्या मार्‍यानेंच इंग्रजांचा पुरता फडशा पाडला. पुढें १४५० त सातव्या चार्लसनें तोफखान्याच्या जोरावरच नार्मंडींतील सर्व इंग्रजी किल्ले पाडाव केले.

या शास्त्रावर यूरोपमध्यें डूरर, पेगन मार्टिनी, सेबास्टियन ग्यालो, स्पेकल, म्याकिआव्हेली वगैरे लोकांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. पुढें १७ व्या शतकांत रेखागणिताच्या आधारावर किल्ल्यांची बांधणी करण्यास सुरुवात झाली. याचा पुरस्कर्ता मार्चीं नांवाचा एक इटालियन होता. अठराव्या शतकांत कॉर्मोन्टेन म्हणून एका फ्रेंच माणसानें तटबंदी व खंदक यांत कांहीं सुधारणा केल्या त्या फ्रँको-जर्मन युद्धापर्यंत (१८७०) अंमलांत होत्या. जर्मनींत फ्रान्सच्या सरहद्दीवरील मोठमोठ्या किल्ल्यांत जी एक नवीन (निरनिराळे १०।१२ किल्ले मिळून एक मोठा किल्ला बनविणें) रीत उपयोगांत आलेली गेल्या महायुद्धांत दृष्टीस पडली, ती व्हाउबन नांवाच्या एका फ्रेंचानें मूळ शोधून काढलेली आहे (१७००). मात्र तिचा विस्तार जर्मनीनें केला. असल्या प्रकारचे किल्ले म्हणजे अँटवर्प, पोसेन, पोर्टआर्थर, मेट्झ, व्हर्डुन वगैरे होत. यांत मुख्य किल्ल्याभोंवतीं अनेक लहान लहान किल्ल्यांची एक रांग (माळ) असते. अँटवर्पच्या मुख्य किल्ल्याभोंवतीं असे सतरा किल्ले आहेत. मुख्य किल्ल्यापासून किती अंतरावर (त्रिज्या) हे छोटे किल्ले असावेत तें त्या त्या ठिकाणच्या जमीनीच्या स्वरूपावर अवलंबून असतें. पारीसच्या मुख्य किल्ल्यापासून हे छोटे किल्ले १८ हजार यार्डांवर आहेत. व्हर्डून येथील हें अंतर १२ पासून २।।  हजार यार्ड, मेट्झ येथें २।। ते ४।। हजार यार्ड व स्टास्सबर्गं येथें ५ ते १० हजार यार्ड अंतर आहे. या किल्ल्याच्या संरक्षणार्थ अर्थातच सैन्य जास्त लागतें. मात्र त्याबरोबरच शत्रूला पुष्कळ दिवस थोपवूनहि धरतां येतें. पण गेल्या महायुद्धांत विमानांनीं व मोठ्या हॉविट्झर तोफांनीं व ६० शेरी गोळ्यांनीं या किल्ल्यांचा भ्रम फेडला. असे किल्ले हिंदुस्थानांत कांहीं आहेत. पुरंधर, जिंजी, राजमाची, पन्हाळा, ग्वाल्हेर, पेशावर, चितोड, वगैरे किल्ले साधारणतं: वरील जातीचेच (थोड्या प्रमाणांत) होत. असल्या किल्ल्यांमध्यें आंत लहान तोफा ठेवण्याची व मैदानी व महांकाळी (हॉविट्झर) तोफांच्या बातेर्‍या किल्ल्यांच्या बाहेर (छपवून) ठेवण्याची चाल सांप्रत प्रचारांत आहे. मुख्य किल्ल्याचा संबंध या लहान लहान किल्ल्यांशीं आगगाडी अगर पायरस्त्यांनीं (झाडांनीं आच्छादित अशा) जोडलेला असतो. बाँबपासून नुकसान होऊं नये म्हणून बातेर्‍याजवळ अगर किल्ल्यांत वाळूच्या पोत्यांचे धमधमे तयार करतात. शत्रू रात्रीं सुरुंग वगैरे खोदीत असल्यास शोधकदीप (सर्च लाइट) उपयोगांत आणतात. या शोधकदीपांपासून नफ्याबरोबर तोटेहि होतात; शत्रूला आपलीहि जागा दाखविली जाते. तसेंच धुक्यांत यांचा कांहीं उपयोग होत नाहीं. इ. स. १८५०च्या पुढें क्रिमियन लढाई व यांत्रिक तोफा यांच्यामुळे किल्ल्यांच्या बांधणींत पुन्हां सुधारणा झाली. किल्ल्यांचें संरक्षण जसें इतर साधनसामुग्रीवर अवलंबून असतें तसें किल्लेदारावरहि असतें. तो विश्वासू व शूर असला तर आणि अन्नपाण्याचा मुबलक पुरवठा असला तर, शत्रूस किल्ला घेण्यास फार प्रयास पडतात. मुरारबाजी (पुरंदर), विसाजीराम (धारवाड), परशुराम त्रिंबक (सातारा), राजाराममहाराज (जिंजी), चांदबिबी (नगर), मादण्णापंत (गोंवळकोंडा), लक्ष्मीबाईसाहेब (झांशी), मुरारराव घोरपडे (गुत्ती), संगराणा (चितोड), टॉडलेबेन (सेवास्तोपोल), फेनविक (कार्स), उस्मानपाशा (प्लेव्हना) हीं असल्या शूर किल्लेदारांचीं नांवें होत. यांनीं कंसांत दिलेले किल्ले अनेक दिवस लढविले होते. आपल्या महाराष्ट्रांतील असल्या किल्ल्यांचीं व किल्लेदारांचीं (मराठी साम्राज्यांत) उदाहरणें अनेक आढळतील. किल्लेदाराच्या फितुरीनें अजिंक्य किल्ले शत्रूंच्या हस्तगत झाल्याचींहि उदाहरणें आढळतात. सूर्याजी पिसाळ (रायगड), सुभानजी लांवघरे (सातारा), कामवेलनें वेढां दिलेल्या ब्लेचिंगडचा किल्लेदार (१६४५) हीं असलीं उदाहरणें होत. किल्ल्यांतील सर्व शिपाई मरेपर्यंत शत्रूच्या हातीं किल्ला पडूं द्यावयाचा नाहीं अशा गोष्टी रजपुतांच्या व मराठ्यांच्या इतिहासांत अनेक घडलेल्या आहेत. यूरोपमध्यें असलें उदाहरण क्वचितच आढळतें. खडें सैन्य पुष्कळ व युद्धोपयोगी सामुग्रीनें जय्यत तयार असलें तर हल्लींच्या काळीं या किल्ल्यांचा फारसा उपयोग होण्यासारखा नाहीं म्हणून काहीं तज्ज्ञांच्या मतें किल्ल्यांच्या फायद्याप्रमाणें थोडे तोटेहि (हल्लीच्या काळीं) पदरांत पडतात. किल्ले बांधण्यांत जो असंख्य पैका घातला जातो तितक्याचा उपयोग, सैन्य व साधनसामुग्री सर्व जय्यत ठेवण्यांत केल्यास भागण्यासारखें आहे, असें याचें म्हणणें आहे.

[संदर्भग्रंथ- शामशास्त्री- कौटिल्य अर्थशास्त्र; डूरर, स्पेकल, फ्रिट्च, पेगन कार्नाट, झस्ट्रौ, ब्रिलमॉन्ट, ब्रूनर, क्लार्क वगैरे ग्रंथकाराचे ग्रंथ; एन्सायक्लो ब्रिटा. व्हॉ. १०; वाल्मिकिरायायण; महाभारत; भागवत; मराठी रिसायत].

No comments:

Post a Comment