Followers

Friday 17 September 2021

#कुलाबा_किल्ला

 








#कुलाबा_किल्ला
हा मराठा साम्राज्याचा अतिशय महत्वपूर्ण सागरी किल्ला होता. हा किल्ला पश्चिम किनाऱ्यावरती समुद्रामध्ये अलिबाग शहरानजीक आहे. किल्ल्याला एक समुद्राकडे तोंड करून आणि अलिबागकडे असणारे असे दोन दरवाजे आहेत. जरी हा किल्ला जलदुर्ग असला तरीही किल्ल्यावरती असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी हे किल्ल्याचे वेशिष्टय आहे. इसवी सन १७१३ मध्ये बालाजी विश्वनाथ यांच्याशी झालेल्या तहानुसार इतर किल्ल्यासाहित कुलाबा किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांनी या किल्ल्याचा वापर करून ब्रिटिशांच्या बोटीवरती अनेक हल्ले चढवले.
शिवछत्रपतींनी जलदुर्गाचे महत्व लक्षात घेऊन १६८० साली या किल्ल्याची उभारणी सुरु केली. १७ बुरुज असलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट, रुंदी ३५० फूट व तटबंदीची उंची २५ फूट आहे. आज ३०० पेक्षा जास्त वर्षे उलटली, तरी तो सागरी लाटांची पर्वा न करता, खंबीरपणे उभा आहे.
समुद्राला पूर्ण भरती आल्यावर किल्ल्याच्या चारही बाजूंना पाण्याच्या प्रचंड लाटा उसळतात. तरीही मुख्य प्रवेशव्दारा पासून सुमारे १५ फूटा पर्यंत भरातीचे पाणी येत नाही. मुख्य भागात पुढील बाजुने व मागील समुद्राच्या बाजुने दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. मुख्य व्दारातुन आत गेले की लगेच दुसरा दरवाजा लागतो, तो पार केला की महिषासुराचे दर्शन होते. तसेच तेथे श्रीपद्मावतीची घुमटी आहे. पूर्व दिशेस गडदेवतेचे मंदिर आहे. गणपती मंदिरा जवळच कान्होबाची म्हणजेच कानिफनाथांची घुमटी आहे.
किल्ल्यावरील पुष्करणी समोर १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी सुरेख गणपती मंदिर उभारले. मंदिरातील सिध्दीविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, ती असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान ठरली आहे. गाभार्यात अष्टभुजा देवी, श्री शंकर, सुर्य, विष्णु यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या एकत्रीकरणामुळे हे 'श्री गणेश पंचयतन' म्हणून ओळखले जाते. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा गोडया पाण्याचा एक तलाव आहे, तसेच गोडया पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यातील एका बुरुजावर गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत.

No comments:

Post a Comment