Followers

Tuesday 11 August 2020

आड (Aad)

 

#महाराष्ट्रातील_गड_किल्ले 

#भाग_१





आड (Aad)
किल्ल्याची ऊंची : 4050
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही.
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. त्यामुळे सिन्नर जवळ आड, डुबेरगड या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीकडे येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असावा. आड किल्ल्यावरुन एका बाजूला डुबेरगड, सिन्नर व दुसर्‍या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.

खाजगी वहानाने डुबेरगड, आड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे चार किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहाता येतात.

पहाण्याची ठिकाणे :आड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण बाजूला किल्ल्याच्या डोंगराजवळ एक छोटा डोंगर आहे. आडवाडीतून आड किल्ल्याकडे जाणार्‍या वाटेवर मातीचे धरण आहे. या धरणाच्या बाजूने शेतातून वाट किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरा पर्यंत जाते. या कौलारु हनुमान मंदिरात हनुमानाची मुर्ती, पिंड आणि २ वीरगळी आहेत. हनुमान मंदिर किल्ल्याच्या उत्तर टोकाच्या पायथ्याशी आहे. हनुमान मंदिरापासून एक पायवाट किल्ल्याच्या डोंगराच्या मध्य भागातून डोंगराच्या पाऊण उंचीवर असलेल्या कातळातील गुहेपाशी जाते. हनुमान मंदिरापासून गुहे पर्यंत पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे. गुहेत एक बाक आणि गुहेच्या बाहेर पाण्याचे टाक कोरलेले आहे. ते टाक सध्या कोरडेच आहे. गुहेत आडूबाईचे ठाण आहे. येथे काही नव्या जुन्या मुर्ती आहेत.

गुहेत थोडावेळ आराम करुन किल्ल्याच्या उत्तरेकडील डोंगरधारेकडे चालायला सुरुवात करावी. ५ मिनिटात आपण डोंगर धारेवर पोहोचतो. याठीकाणी कातळात कोरलेल्या १० पायर्‍या आहेत. या पायर्‍यांवरुन जपून चढावे लागते. पायर्‍या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर समोरच एक बुजलेले पाण्याचे टाक आहे. त्याच्या थोडे पुढे एकमेकांना काटकोनात असलेली दोन पाण्याची मोठी टाकी आहेत. या टाक्यांच्या डाव्या बाजूला ५ टाक्यांचा समुह आहे. या सर्व टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या पुढे गडावरील उंचवटा आहे. पण त्या उंचवट्याकडे न जाता डाव्या बाजूने किल्ल्याच्या कडेकडेने प्रदक्षिणा चालू करावी.

गड प्रदक्षिणेत प्रथम एक कोरडा तलाव दिसतो. पुढे कड्यावर वास्तूचे अवशेष दिसतात. त्यापुढे एक कोरडे पाण्याचे टाके आहे. पुढे १५ मिनिटे चालत जाऊन वळसा मारल्यावर आपण किल्ल्याच्या मागिल बाजूस येतो. याठिकाणी एक पडकी वास्तू आहे. तिच्या भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेत. या वास्तूच्या पुढे पाच टाक्यांचा एक समुह आहे. यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून झाल्यावर मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर चढून जावे. याठिकाणी २ वीरगळी आहेत. माथ्यावर वास्तूंचे चौथरे आहेत. ते सर्व पाहून परत टाक्यांपाशी उतरावे आणि पुढे चालायला सुरुवात करावी. मधल्या टेकाडाला वळसा घातल्यावर कड्या जवळ असणार्‍या एका खाचेत किल्ल्याचा उध्वस्त प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार वरुन चटकन नजरेस पडत नाही त्यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. प्रवेशव्दाराच्या दरवाजीची कमान तुटलेली आहे. बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत. दरवाजातून खाली उतरणारी वाट मोडलेली आहे. त्यामुळे या वाटेने खाली उतरता येत नाही.

किल्ल्याचे प्रवेशव्दार पाहून पुन्हा वर येऊन गड प्रदक्षिणा चालू करावी. ५ मिनिटात आपण एका कोरड्या टाक्यापाशी पोहोचतो. हे टाक पाहून पुढे गेल्यावर आपण काटकोनात असलेल्या दोन टक्यांपाशी पोहोचतो. येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यास एक तास लागतो.

आड किल्ल्यावरुन पश्चिमेला अवंधा (औंधा), पट्टा, बितनगड आणि त्यामागे कलसूबाईचे शिखर दिसते. तर ईशान्येला डुबेरगड (डुबेरा) दिसतो.

पोहोचण्याच्या वाटा :सिन्नर हे आड किल्ल्या जवळचे मोठे शहर आहे. सिन्नरहून आडवाडी गावात जाण्यासाठी दिवसातून ५ एसटी बसेसची सोय आहे. याशिवाय खाजगी जीप (वडाप) सिन्नर ते ठाणगाव अशा धावतात. ठाणगावहून जीपने आडवाडी गाठता येते.

मुंबई नाशिक महामार्गाने घोटी पर्यंत येऊन पुढे घोटी सिन्नर रस्त्याने हरसुल गावापर्यंत यावे. हरसूल गावातून ठाणगावला गावाला जाणारा रस्ता आहे. ठाणगाव ते आडवाडी अंतर ७ किलोमीटर आहे. आडवाडीतून धरणा जवळून कच्चा रस्ता किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत जातो. या रस्त्याने आडवाडीतून किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी २० मिनिटे लागतात. किल्ल्याचा पायथा ते गडमाथा जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. मुंबई ते आडवाडी अंतर २०० किमी आहे.

राहाण्याची सोय :किल्ल्यावरील गुहेत २० जणांची राहाण्याची सोय आहे.

जेवणाची सोय :जेवणाची सोय ठाणगाव / सिन्नरला आहे.

पाण्याची सोय :किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ :पायथ्यापासून ३० मिनिटे, आडवाडी गावातून किल्ल्यावर जाण्यास १ तास लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :जुन ते फ़ेब्रुवारी

संदर्भ:-
http://trekshitiz.com/mar…/Forts_in_Maharashtra_Marathi.html

No comments:

Post a Comment