Followers

Monday 22 June 2020

किल्ले शिवनेरी.

दुर्ग क्रमांक : ७.



किल्ले शिवनेरी.

#नाव_किल्ले_शिवनेरी.
उंची : ३५०० फूट.
प्रकार : गिरिदुर्ग.
चढाईची श्रेणी : मध्यम.
ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
जवळचे गाव : जुन्नर.
डोंगररांग : नाणेघाट.
सध्याची अवस्था : सर्वात चांगली.
स्थापना : ११७०.

#१९_फेब्रुवारी_१६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता. हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व राजमाता जिजाऊ व बाल-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा आहेत.
या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे.

शिवनेरी अगदी जुन्नर शहरात आहे. जुन्नरमधे शिरतानाच किल्ले शिवनेरीचे दर्शन होते. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे...

#इतिहास :
‘जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.

सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ.स. १४४३ मध्ये मलिक– उल–तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ.स. १४७० मध्ये मलिक– उल–तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते.

यानंतर इ.स. १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. राजमाता जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर १६२९ मध्ये राजमाता जिजामाता गरोदर असताना छत्रपती शहाजी राजे त्यांना ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. ‘शिवनेरी गडावर श्रीभवानीमाता शिवाई ना राजमाता जीजाऊ यांनी नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन. त्याउप्पर, शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीयेला, शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म जाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये राजमाता जिजाबाईनी छत्रपती शिवाजी राजे सह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. पुढे इ.स.१६७३ मध्ये किल्ले शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न छत्रपती राजे शिवाजी यांनी केला. इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला.

- गड-किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment