Followers

Wednesday 28 April 2021

#गोष्ट_अजिंठा_लेणींची




 #गोष्ट_अजिंठा_लेणींची

इ.स. पुर्व दुसरं शतक.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकाच वेळी लेणी खोदण्याचे काम सुरु झालंय.
नांगरायला काळी माती आणि कोरायला दख्खनचा बेसाल्ट असला तर सोने पे सुहागा..
....तर एक बौध्द भंते जे उत्कृष्ट स्थपतीसुध्दा आहेत अजिंठ्यात उतरतात.नारळ जसा टिचक्या मारुन,कानाला लावून पारखला जातो तसाच हा इथला घोड्याच्या नालेच्या आकाराचा अगडबंब,उघडबंब काळा कातळ बघतात टिचकी मारुन..
भुरचना विशेषतः इथला पैनोरामीक व्ह्यु त्यांना भावतो.एक कटाक्ष कातळावर पडतो,डोळ्यात चमक अन् एक मंद स्मित रेषा...
.. सभोवतालच्या जंगलातले लाकुड आणून अनावश्यक असलेल्या मोठमोठ्या पत्थरांजवळ पेटवले जाते.गरम झालेल्या कातळावर पाणी सोडलं जातं.अन् मग दुभंगलेले पत्थर दरीत ढकलले जातात.
......राजे,व्यापारी, सामंत यांजकरवी द्रव्य मिळतं.कारागिरांची गामे वसवली जातात.पिढ्यानपिढ्या शतकानुशतके छिन्नी हातोड्याचे घाव बेसाल्ट हसतमुखाने सहन करतो.जणु काही बुध्द होण्यासाठीची बोधिसत्वाची सत्वपरिक्षाच...
लेणी शिल्पींकडून कोरली जातात नालंदादी विद्यापिठांतून चित्रकलेत प्राविण्य मिळवलेले कलाकार त्या शिल्पांवर रंग चढवतात.छतं,भिंती, कोपरा न् कोपरा मिळेल तिथे बुध्द, बोधिसत्व,राजे प्रजा,परदेशी प्रवासी,परिचारिका, राण्या,नोकरचाकर,फळे,फुले,वेली,प्राणी चितारले जातात. कोपरे रंगविले जातात.
शेकडो वर्षे अजिंठा लेणी कला,स्थापत्य,शिल्प आणि धम्म यांना कवेत घेऊन भंते व विद्यार्थ्यांनी ओसंडून वाहते.
....कालौघात अनेक घडामोडी घडतात. राजाश्रय तुटतो.द्रव्य आटते. कारागीर निघून जातात.मग धम्माचं निर्गमन होतं,भंते ही निघून जातात.निर्जन लेणी उज्वल इतिहास आठवत पावसासवे आसवं ढाळतात शतकानुशतके.
....... माती जमा होते ,वेली,पक्षी,श्वापदांची वस्ती वसते.अजिंठा लेणी लुप्त होतात जसा धम्म लुप्त झाला तशाच.शेकडो वर्षे...
मग इंग्रज येतात.जॉन स्मिथ व त्यांचं लष्कर, संशोधक, जिज्ञासू, इतिहास संशोधक, चित्रकार रॉबर्ट गील,त्याची पारो...
सर्वजण आपापल्या परिने जतन करतात,संवर्धन करतात.संशोधन करतात. इंग्रजांमुळे लेणी उजेडात येतात,उत्खनन केलं जातं,शिलालेख वाचले जातात,
आणि अनेक विद्वानांची नजर लेणी, स्तुप,स्तंभाभरोबरच बौद्ध धम्म आणि तत्वज्ञानावर पडते.
पुन्हा उत्खनन स्तुपांचं,
जतन लेणींचं आणि
बाबासाहेबांद्वारे पुनरागमन होतं धम्माचं....
बौध्द धम्माचं....!!
अजिंठा लेणींचा शोध लागुन दोनशे वर्षे झालीत आज.खुपच सुंदर लेणी आहेत...
सुंदर तत्वज्ञान, धम्म चित्रित करुन ठेवलाय पुर्वजांनी...
जतन करुयात...
एका उर्दु शायराच्या ओळी आहेत अजिंठ्यावर लिहिलेल्या..
जहां नगमें जनम लेते है
रंगिनी बरसती हे..
दख्खन की गोद में आबाहा
ये खाबों की वस्ती है..
ये तस्वीरें बजाहेर साकेत
व खामोश रहती है..
मगर अहले नजर पुछे तो
दिल की बात कहती है...
मंगेश जावळे,कल्याण
२८/०४/२०१९

No comments:

Post a Comment