Followers

Thursday 8 April 2021

*धाबादेव लेणी एक ऐतिहासिक ठेवा*

 


*धाबादेव लेणी एक ऐतिहासिक ठेवा*
बोराडी जवळ सातपुड्याच्या पायथ्याशी दोन नाल्यांच्या संगमावर धाबादेव लेणी आहे.ही लेणी सातव्या शतकातील यादवकालीन असल्याचे सांगण्यात येते. येथील लेणी दगडावर नक्षीकाम करुन सर्व दगड एकमेकांवर रचल्याप्रमाणे ठेवले आहेत.विशेष म्हणजे हा दगड बाहेरुन आणलेला असावा कारण परीसरात अशा प्रकारचा दगड मिळत नाही. जोडणीसाठी चुना किंवा इतर कशाचाही वापर केलेला नाही.सध्या तीन खोल्या(गाळे) शिल्लक आहेत. पुर्वी येथे 18 गाळे असावेत असे अवशेषांवरून वाटते.प्रत्येक खोली साधारण चार फुट लांब व रुंद असुन,ऊंचीसुद्धा चार फुट पर्यंत आहे.भिंतींवर नक्षीकाम असुन वेगवेगळ्या कोरीव मुर्त्या बसविलेल्या आहेत.छत चौकोणी आकाराचे असुन त्यावर वर्तुळात पानाफुलांची सुबक नक्षी काढलेली आहे.खांबाच्या वर यक्षांची मुर्ती काढलेली आहे. याठीकाणी पद्मासन अवस्थेतील गौतम बुद्ध,महाविर,महादेव,विष्णु,हनुमान,यक्ष,अशा वेगवेगळ्या सुबक कोरीव काम केलेल्या अनेक मुर्त्या आहेत.व अनेक मुर्त्या परिसरात विखुरलेल्या आहेत.अजिंठा-वेरुळ सारख्या हत्ती,माणसांच्या कोरीव नक्षीकाम केलेल्या मुर्त्यापण आहेत.20/25 वर्षापुर्वी एक शिलालेख चांगल्या अवस्थेत होता.आज त्याचे तुकडे झाले आहेत.त्यावर मोडीसारख्या भाषेत लिहिलेले होते.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी येथे अतिशय घनदाट जंगल होते.येथे येण्यासाठी रस्ताही नव्हता,तर सातव्या शतकात अशा बिकट परिस्थितीत या लेण्यांचे काम कोणी केले असेल या इतिहासावर प्रकाश पडायला हवा. त्यांना निश्चितच राजाश्रय असेल. काही जाणकारांच्या मते इथे तप- साधना होत असावी किंवा उत्तर-दक्षिणेकडुन येणारे धर्मसाधकांसाठी थांबण्याचे ठीकाण असावे.जवळच अतिशय निसर्गरम्य वातावरण असुन नाल्यांवर तीन-चार धबधबे आहेत.पाऊस पडल्यानंतर फेसाळणारे पांढराशुभ्र पाणी पाहुन मन आनंदित होते.यामुळे येथे पर्यटकांचा वावर वाढला आहे.पण *सध्या कोरोना संसर्गामुळे येथे येणे टाळावे*.सध्या ही लेणी मोडकळीस आली असुन छताच्या दगडांना तडे पडले आहेत.जर डागडुजी केली नाही तर,छत पडुन लेणी अस्तित्व व इथला इतिहास नष्ट होईल.त्या काळात इथे जवळपास वस्ती असली पाहीजे.
शिरपूर तालुक्यातील अतिशय पुरातन,ऐतिहासिक ठेवा आहे व तो जतन झाला पाहीजे.नवादेवी,गुर्हाडपाणीचे तोरणमाळसारखे निसर्गसौंदर्य ,धाबादेव लेणी,दुर्बड्याचे मुळ बिजासनी मंदीर,बिजासन अशा भागाला पर्यदनाच्या दृष्टिने महत्त्व येऊन या भागाचा विकास होऊ शकतो.
*गणेश भामरे बोराडी*

No comments:

Post a Comment