Followers

Saturday 20 March 2021

बॅरन लँड म्हणून संबोधला गेलेले कातळपड आणि पोटखराबा क्षेत्र

 

*प्रागैतिहासिक – ऐतिहासिक – नैसर्गिक बाबींनी परिपूर्ण
महाराष्ट्रातील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र बनण्याची क्षमता असलेला प्रदेश*.
वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक भुदृश्य लाभलेला सडा
गोवळ - बारसु - पन्हाळे - सोलगाव - देवाचे गोठणे
( राजापूर लॅटेराइट सरफेस )
क्षमता संधी आणि पर्यावरण पूरक शास्वत विकास
कोकणात सडा म्हंटले तर डोळ्यासमोर उभे रहाते ते वैराण, रखरखीत भूप्रदेशाचे दृश्य. सरकारी दप्तरी अकारण















बॅरन लँड म्हणून संबोधला गेलेले कातळपड आणि पोटखराबा क्षेत्र. असा हा कोकणातील सडा आजूबाजूच्या प्रदेशाचे अर्थकारण बदलू शकेल ? आपला विश्वास बसणार नाही. पण त्याचे उत्तर आहे होय. याचे कारण आपण ह्या सडयांकडे आणि आजूबाजूच्या परिसराकडे खऱ्या अर्थाने आपण कधी पाहिलेच नाही .
जांभा खडकांचे कातळ सडे हे दक्षिण कोकणाचे खास वैशिष्ट्य. या सड्यांपैकी स्वतःचे वेगळेपण जपणारा सडा म्हणजे राजापूर तालुक्यातील बारसु, गोवळ, देवाचे गोठणे , सोलगाव परिसरातील सडा. या भागाला भौगोलिक भाषेत राजापूर लॅटेराइट सरफेस असे ओळखले जाते.
कोकणातील जांभा दगडाचा (Laterite) विशेषतः इथला द्वितीयक (secondary) जांभ्याने बनलेला पठाराचा ( Lateritic Plateau ) भाग अनेक दृष्टीने वेगळा आहे. कोकणच्या भूशास्त्रीय आणि सागर पातळीतील बदलांच्या इतिहासाच्या संदर्भात राजापूरच्या या सड्याला वेगळेच महत्व आहे. ह्या सड्याचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे द्वितीयक जांभा दगडाचा सर्वाधिक जाड थर या सड्याला लाभला आहे. जांभा दगडाचा एवढा जड थर भारतात अन्यत्र कोठेही आढळून येत नाही. हा सडा आपल्या पोटात मुबलक भूजल साठे बाळगून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बारसु, सोलगाव या गावातून वाहणारे बारमाही ओढे, पाट. नैसर्गिक जलव्यवस्थापना उत्तम नुमना या सड्याच्या कुशीत पहायला मिळतो, हा सडा म्हणजे निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे.
दक्षिणेकडे राजापूर , पन्हाळे , गोवळ तर नैऋत्य - वायव्येस देवाचे गोठणे, उत्तर दिशेस सोलगाव ही गावे या सड्याच्या कुशीत वसली आहेत. या सड्यावरील मध्य भागात असलेल्या खोलगट भागात बारसु हे गाव वसले आहे. त्या त्या गावाच्या नजीकच्या सड्याला त्या गावच्या नावाने ओळखले जाते. वैशिष्ट्यपूर्ण अशा या भूप्रदेशातील देवाचे गोठणेच्या गावच्या सड्यावर आपणास ‘चुंबकीय विस्थापन’ हे निसर्ग नवल अनुभवयास मिळते. सुमारे 500 चौरस मीटर परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई अयोग्य दिशा दर्शन करते. ज्ञात माहिती नुसार द्वितीयक जांभा दगडात मोठ्या प्रमाणांत चुंबकीय विस्थापन दर्शविणारी ही जगातील एकमेव जागा आहे. त्याच बरोबर या सड्यावर पृथ्वीच्या जडघडणीचे साक्षीदार असलेले लाखो वर्षांपूर्वीचे जिवाष्म देखील आढळून आले आहे .
या संपूर्ण सड्यावर अष्मयुगीन मानव निर्मित कातळ खोद चित्ररूपी नवलाचा खजिना मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सुमारे 60 चौरस किमी क्षेत्रफळाच्या या सड्यावर विविध ठिकाणी सुमारे 160 पेक्षा अधिक कातळ खोद चित्र आढळून येतात. या खोद चित्रांमध्ये मोठे वैविध्य आढळून येते. देवाचे गोठणे या गावाच्या सड्यावर विविध ठिकाणी मिळून 10 पेक्षा अधिक खोद रचना आहेत. त्यात काही मनुष्याकृती कोरल्याचे दिसून येते. बारसु - पन्हाळे भागात 60 पेक्षा अधिक चित्र रचना आहेत. या भागातील तारवाच्या सड्यावर आशिया खंडात आढळून येणाऱ्या सर्वात मोठ्या खोद चित्र रचनांपैकी एक चित्ररचना आढळून येते. तब्बल 57 फूट लांब व 14 फूट रुंदीच्या या रचने सोबत विविध खोद चित्र रचनांचा समूह येथे आढळून येतो. याच भागात थोड्या दूर असलेल्या भौमितिक रचना आपल्या तर्कशक्तीला आव्हान देतात. या बारसू च्या सड्यावरून राजापूर तालुक्याच्या सह्याद्री आणि समुद्र या दोन्ही नैसर्गिक सीमांचे दर्शन होते.
गोवळ परिसरातील सड्यावर सुमारे 45 पेक्षा अधिक चित्र रचनांचा समूह आहे. प्राणी पक्षी, भौमितिक रचना यांनी हा परिसर व्यापलेला आहे.
सोगमवाडी , सोलगाव या गावांच्या सड्यावरील चित्र रचनांमध्ये मोठ्या आकाराच्या प्राण्यांचे दर्शन होते .येथील रचना वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी साधर्म्य साधणाऱ्या आहेत. या चित्र रचनांमधील गवा रेडा, हत्ती, एक शिंगी गेंडा यांच्या रचना तत्कालीन कालखंडातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामानावर यांच्या भाष्य करण्यास पुरेश्या बोलक्या आहेत. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 30 पेक्षा अधिक खोद चित्र रचना आढळून येतात. हजारो वर्षांचा मानवाचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या या कातळ खोद रचना आणि आपल्या अंगावर या रचना बाळगणारा सडा महत्वपूर्ण आहे म्हणणे अधिक योग्य.
वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपले वेगवेगळे रूप दाखविणारा हा सडा पावसाळ्यात विलोभनीय रूप धारण करतो. सड्यावर पाण्याची लहान मोठी तळी निर्माण होतात. सगळा परिसर हिरवा शालू आपल्या अंगावर धारण करतो. जवळपास 30 पेक्षा अधिक गवताच्या प्रजाती आणि 150 पेक्षा अधिक प्रजातींच्या रंगीबेरंगी कातळ फुलांनी हा परिसर खुलून जातो. हे सौन्दर्य अनुभवताना आपण भारावून जातो. पावसाळ्यात सड्यावर एक आगळी वेगळी परिसंस्था अनुभवायास मिळते. ही परिसंस्था आजूबाजूच्या फळांच्या बागा, शेती आणि मानवी जीवन यांसाठी पूरक आणि अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
या सड्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अनेक ठिकाणी शेती योग्य भागांची निर्मिती झाली आहे. गेल्या काही वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणत शेती केली जात होती. आजही काही प्रमाणात सड्यावर शेती केली जाते. पशुपालन करणाऱ्या माणसांसाठी हा सडा तर अत्यंत महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे या सड्याचा कुशीतून वाहणारऱ्या खाडी किनारी असणारा प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण पिकांसाठी ओळखला जातो. गोवळ गावात तयार होणारी वांगी खूप प्रसिद्ध आहेत. या गावातून येणाऱ्या दिवसाच्या पहिल्या बसगाडीला ‘वांगी एक्सप्रेस’ नावाने ओळखले जाते. भाजीच्या नावावरून बस सेवेला पडलेले नाव तसे दुर्मिळच म्हणावे लागेल.
उन्हाळ्याच्या दिवसात रखरखीत भासणाऱ्या दक्षिण कोकणातील सड्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. पावसाचे पडणारे अधिक तर पाणी हे सडे आपल्या पोटात सामावून घेतात. आणि हे पाणी पुढे जवळपास वर्षभर सड्याचा कुशीतील गावांची पाण्याची तहान भागवतात. सड्यांवर मातीचे प्रमाण कमी असले तरी सड्यांच्या उताराच्या बाजूंवर मात्र मिश्र जंगले आढळून येतात. या जंगलांची जागा आता आंबा काजूच्या बागांनी घेतली आहे. राजापूरच्या या भागात देखील मिश्र जंगले आणि खूप मोठ्या प्रमाणात आंबा काजूच्या बागा आहेत. या बागांचे उत्पप्न संपूर्णपणे परिसरातील सड्यांवरील परिसंस्थेवर अवलंबून आहे हे दुर्लक्षून चालणार नाही.
सह्याद्री मध्ये उगम पावून पश्चिमेकडे वाहणारी अर्जुना नदी , राजापूर शहरापासून पुढे राजापूरची खाडी हे नाव धारण करते. ही खाडी बारसु- पन्हाळे सड्याचा दक्षिण कुशीतून वाहत देवाचे गोठणे भागात झोकदार वळण घेत उत्तर दिशेकडे वळते. ( कोकणातील खाड्यांचे हे अजून एक वैशिष्ट्य ) पुढे जैतापूर जवळ परत एकदा पश्चिमेकडे वळत आंबोळगड जवळ समुद्राला मिळते. राजापूर लॅटेराईट सरफेस नावाने भौगोलिक भाषेत ओळखल्या जाणाऱ्या या सड्याचा कुशीत वसलेले राजापूर हे इतिहास काळात एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. याच कारणाने या सड्याचा कुशीत अनेक ऐतिहासिक बाबी पहावयास मिळतात. राजापूरची गढी, राजापूर बंदर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. धबधब्याच्या शेजारी असलेले 400 वर्षांचा इतिहास लाभलेले धुतपापेश्वर मंदिर आणि परिसर आपल्याला एक वेगळी अनुभूती देऊन जातो. देवाचे गोठणे गावात कोकणाचा आद्य निर्माता भगवान परशुराम म्हणजेच भार्गवराम मंदिर आहे. चारशे वर्षांचा इतिहास लाभलेले हे मुघल आणि मराठा मिश्र शैलीतील हे मध्ययुगीन मंदिर. मंदिराच्या कडेला बारमाही वाहणारा ओढा, सड्यावर घेऊन जाणारी प्राचीन पाखाडी. सर्वच परिसर आंनद देणारा.
सड्यावरील विस्तीर्ण रानमाळ , सड्याच्या उतारावरील मिश्र जंगल, कुशीत वाहणारी अर्जुना नदी / राजापूरची खाडी , या सड्याचा मधोमध दोन भाग करणारा बारसु जवळील खोलगट भाग , तिथून वाहणारा बारमाही वहाळ या परिस्थितीमुळे संमिश्र परिसंस्था या परिसरात पहावयास मिळते. सुमारे 150 पेक्षा अधिक विविध जाती प्रजातींचे पक्षी, सुमारे 40 पेक्षा अधिक प्राणी तेवढ्याच संख्येने आढळून येणारे सरीसृप या परिसराची जैवविविधता परिपूर्ण करतात.
जगाच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अशी सुमारे 160 पेक्षा अधिक अष्मयुगीन कातळ खोद चित्र, धोपेश्वर मंदिर, भार्गवराम मंदिर, पाखड्या यांसारख्या ऐतिहासिक वास्तू, खाडीतील जावे बेट , अमाप निसर्ग सौन्दर्य, सुमारे 10 किमी लांबीची खाडी याबाबी पर्यटन क्षेत्राचे अनेक पैलू उलगडतात.
वारसा पर्यटन, निसर्ग पर्यटन, जल पर्यटन, साहसी पर्यटन, अशी अनेक पर्यटनाची दालने या परिसरात सामावलेली आहेत. पर्यटन विषयावर आधारित खुले आकाश दर्शन , प्री हिस्टोरीक पार्क, फळ प्रक्रिया केंद्र असे अनेक प्रकल्प या भागात उभे राहू शकतात. शेती आणि बागायती यांना कृषी पर्यटनाची जोड देणे शक्य आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि आर्थिक उलाढाल निर्माण होऊ शकते.
यासाठी काय करावयास हवे , सड्यावरील जागतिक वारसा स्थळात समाविष्ट होण्याची क्षमता बाळगणारी कातळ खोद चित्र ठिकाणे एकमेकाला सुयोग्य मार्गाने जोडणे. ( युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्यासाठी आवश्यक कारवाई सुरवात झाली आहे. त्यात या स्थळांचा देखील समावेश आहे.) ही चित्र ठिकाणे एकमेकाला जोडणे म्हणजे गोवळ, देवाचे गोठणे, सोलगाव, सोगमवाडी आणि राजापूर ही गावे एकमेकाला कमी अंतराने जोडणेच आहे. त्याचा फायदा फक्त खोद चित्र रचनांना नाही तर परिसरातील सर्व गावांना होऊ शकेल. सड्यावरील शेती, बागायती यांना खूप मोठा उपयोग होऊ शकेल. पर्यटकांना सर्व ठिकाणी जाणे सहज शक्य होईल. याचाच वापर सायकलिंग ट्रॅक म्हणून सुद्धा होऊ शकेल ही बाब पर्यटकांना आकर्षित करणारी आहे. या मार्गाच्या बाजूने विशिष्ठ प्रकारची झाडे लावल्यास , हा मार्ग पहाण्यासाठी देखील पर्यटक येउ शकतील. चित्रपट माध्यमांना देखील पुरेसा लँडस्केप या परिसरात आहे.
कृषी पर्यटन, होम स्टे , तंबू निवास यांसारख्या बाबीना प्राधान्य देउन आलेल्या अभ्यागतांची निवास व्यवस्था निर्माण करता येउ शकेल. त्याचा फायदा निश्चितच स्थानिकांना होईल. स्थानिक कला, खाद्य संस्कृती यांना चालना मिळेल. यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने रोजगार निर्माण होईल. प्रत्येक हातात काम करण्याची आणि स्वरोजगार निर्मितीची संधी यामध्ये सामावलेली आहे. अर्थात त्याचा सकारात्मक परिणाम परिसरातील अर्थव्यवस्थेवर होईल यात शंका नाही.
हा परिणाम घडविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिकांची मनोभूमिका आणि सहकार्य. जे आहे तसे जपण्याची तयारी. डेव्हलमेंट सारख्या जडजड शब्दाच्या मागे न धावता पूरक गोष्टींची निर्मिती. नियमांच्या गुंतवळ्यात न अडकता प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती आणि स्थानिकांना सोबत घेत काम करण्याची शासनाची आणि प्रशासनाची भूमिका. या गोष्टी घडल्या तर हा परिसर महाराष्ट्रातील एक सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनेल यात शंका नाही. यातून पर्यावरण व परिसंस्थेचे रक्षण होईलच आणि शास्वत विकासाची कासही धरता येईल. यातून या परिसराचे अर्थकारण पालटून जाईल.
तसे पहाता पूर्णगड ते राजापूर ह्या भागाकडे सांस्कृतिक वारसा जतन करणारा एक विलक्षण भूशास्त्रीय प्रदेश म्हणूनच बघणे इष्ट आहे. भारतातील एक मोठे पर्यटन क्षेत्र बनण्याची क्षमता या परिसरात आहे. या बाबींचा आदर राखत पर्यावरण पूरक विकासाच्या संकल्पना राबविणे गरजेचे आहे. निसर्गयात्री संस्था सदस्यांच्या शोध कार्यातून आणि चालू असलेल्या कामातून आज हजारो पर्यटकांनी या परिसराला भेट दिली आहे देत आहेत. यात परदेशी पर्यटकांचा, अभ्यासकांचा देखील आहेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. संस्था सदस्यांच्या कामातून या परिसराची ओळख जगाला झाली आहे. आणि यासाठी संस्था सदस्य स्वखर्चाने अविश्रांत मेहनत घेत आहेत. यांच्या प्रयत्नांना साथ देउन पर्यावरण पूरक शास्वत पर्यटन विकास साधायचा का ?
वारसा आणि निसर्ग स्थळांचा आदर राखून त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत आर्थिक विकास साधणारी अनेक उदाहरणे आज आपल्या डोळ्यासमोर आहेत. अर्थात तिथल्या बाबींचे अंधानुकरण करणे देखील योग्य नाही. आपल्या परिसराचा परिपूर्ण अभ्यास करून त्याला पूरक गोष्टी राबविणे गरजेचे आहे.
वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक भुदृश्य असलेला सडा इथल्या मानवी जीवनाचा गाभा आहे. भारत देशाचा आणि एकूणच मानवी उत्क्रांतीचा खूप मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने बहुमोल आहे.
म्हणूनच हा सडा येथील परिसरातील अर्थकारण बदलण्याची क्षमता बाळगून आहे. गरज आहे ती दृष्टीकोनाची. आणि एकमेकांना पूरक साथीची.
सुधीर ( भाई ) रिसबुड, रत्नागिरी
( श्री सुधीर रिसबुड, श्री धनंजय मराठे आणि डॉ सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी या सड्यावरील जवळपास सर्व कातळ खोद चित्र शोधून जगासमोर आणली आहेत तसेच देवाचे गोठणे येथील चुंबकीय विस्थापनाचा देखील शोध लावला आहे, त्याच बरोबर त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72 गावातून 1500 पेक्षा अधिक कातळ खोद चित्र रचनांचा शोध घेतला आहे. आणि या भागाचा सविस्तर अभ्यास चालू आहे ) संस्थेच्या माध्यमातून या खोद चित्रांच्या संरक्षण संवर्धनासाठी देखील सातत्याने प्रयत्न चालू आहेत. दोन तीन ठिकाणी पर्यटन प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहे.

No comments:

Post a Comment