Followers

Wednesday 31 March 2021

नागपुरचा किल्ला

 

NAGPUR FORT नागपूर शहराच्या महाल भागात गोंड राजाचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा

नागपुरचा किल्ला आहे. हा किल्ला आहे म्हणण्यापेक्षा होता असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल कारण एक दरवाजा वगळता किल्ला म्हणावा असे या किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. जुन्या नागपुरात महालामधील कल्याणेश्वर मंदीर व दरवाजा प्रसिद्ध आहे. कल्याणेश्वर दरवाजा पार करून पुढे गेल्यावर उजव्या बाजुस एक लहान गल्ली आहे. या गल्लीतच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. कधीकाळी या किल्ल्याभोवती पाण्याने भरलेले खंदक व तटबंदीत अनेक बुरुज असल्याचे वाचनात येते पण वाढत्या शहरीकरणामुळे विदर्भाच्या इतिहासातील एका मोठया कालखंडाचा साक्षीदार या गल्लीत लुप्त झाला आहे. यातील एक बुरुज अगदी अलीकडील काळापर्यंत शिल्लक होता पण आज तोदेखील दिसत नाही. किल्ल्यास उत्तरेच्या असलेल्या मुख्य दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन या दरवाजावर पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख आहे. दरवाजातुन साधारण २०० फुटांवर राजवाड्याचा लाकडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस भग्नावस्थेतील राजवाडा आहे. राजवाड्याचे आवारात संगमरवरी बांधकामातील कारंजे असून एक विहीर पहायला मिळते. गोंड राजाच्या किल्ल्याचे आता आपल्याला इतकेच अवशेष पहायला मिळतात. महाल भागाची भटकंती करताना आपल्याला भोसले यांचा राजवाडा व इतर काही जुने वाडे व मंदिरे पहायला मिळतात. यशिवाय वेशीच्या तटबंदीत जुम्मा दरवाजा, कल्याण दरवाजा व इतर दोन दरवाजे पाहायला मिळतात. मध्य प्रदेशातील राणी दुर्गावतीच्या काळात गढा−मंडला येथील गोंडचे राज्य चांगलेच विस्तारले होते. इ.स.१५६४ सालच्या अकबराच्या स्वारीनंतर या राज्याचे चंद्रपूर आणि देवगड या राज्यांत विभाजन झाले. देवगडचे गोंड घराणे मूळचे हरया किंवा हरयागड येथील होते. या घराण्यातील जातबा या कर्तृत्वान पुरुषाने देवगड ही राज्याची जागा निवडली. गढ्याच्या राजाने मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर जातबाही मांडलिक बनला. अकबराच्या काळात तो २०००स्वार, १०००० पायदळ व १०० हत्तींचा सेनापती असल्याचे वर्णन आइने-ए-अकबरीत येते. त्याचे स्वतःचे नाणे त्या काळात चालत असे. राज्याच्या सीमा नागपुरपर्यंत वाढल्यावर त्याने नागपुरात किल्ला उभारून ठाणे बांधले. जातबानंतर त्याचा मुलगा केसरीशहा उर्फ कोकशाह गादीवर आला. कोकशाहने खंडणी न दिल्याने सन १६३७ मध्ये शाहजहानचा सरदार खानदौरान याने नागपुरपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. यावेळी नागपूरच्या किल्ल्यावर हल्ला करून किल्ल्याचे तीन-चार बुरूज सुरुंग लावून उडवून दिले. www.durgbharari.com

No comments:

Post a Comment