Followers

Friday 10 July 2020

|| किल्ले श्री गंभीरगड ||








|| किल्ले श्री गंभीरगड ||
गंभीरगड (Gambhirgad)
किल्ल्याची ऊंची : 2250फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: पालघर
जिल्हा : ठाणे
श्रेणी : मध्यम
ठाणे जिल्हा आणि दादरा नगर हवेलीच्या सीमेवर हा गंभीरगड हा किल्ला आहे. दाट जंगलाने वेढलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील बोइसर हे जवळचे स्थानक आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गडावर जातांना एक पठार लागत, हे पठार म्हणजेच गंभीरगडाची माची होय. या माचीवर बर्‍याच मोठ्या प्रमाणात जंगल माजलेले आहे. माचीवर गडाचे कोणतेही अवशेष नाहीत. उजव्या डोंगरसोंडेवरुन गडमाथ्याकडे कूच करायचे, वाटेतच कातळात कोरलेले सुरेख पाण्याचे टाके लागते. या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे, मात्र पाणी काढण्यासाठी दोरी बरोबर असणे आवश्यक आहे. येथून पुढे वाट ही कातळकडा उजवीकडे ठेवून पायर्‍यांच्या साह्याने वर जाते. आपण १५ मिनिटातच गडमाथ्यावर पोहचतो. येथे दोन वाटा फुटतात . प्रथम उजवीकडील वाटने थोडे चढून गेल्यावर, काही वास्तुंच्या खूणा दिसतात. एक देवीचे छोटेसे मंदिर सुध्दा दिसते. पाण्याची एक दोन बुजलेली टाकी आढळतात. येथून परत माघारी फिरुन डावीकडचा माथा फिरायला निघायचे. बराचवेळ वाट दगडधोंड्यांमधून पुढे जाते. गडावर पूर्वी तटबंदी असल्याच्या खूणा स्पष्टपणे जाणवतात. डाव्या बाजूच्या डोंगरावर सुध्दा एखाद दोनच अवशेष आहेत. ते पहावयाचे आणि याच बाजूने खाली उतरण्यास सुरुवात करायची. वाटेत दोन ,तीन पाण्याची टाकी लागतात. या बाजूला काही छोटे छोटे सुळके वर आलेले दिसतात. सर्व परिसर पाहण्यास एक ते दीड तास पुरतो. किल्ल्यावरुन महालक्ष्मीचा सुळका, अशेरी, अडसूळ असा परिसर दिसतो.
इतिहास:
येथील कातळकडय़ावर एक विवर दिसते. ते खूप खोल आहे, असे गावकरी सांगतात. त्याबाबत एक लोककथा या भागात प्रचलित आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत दुसऱ्यांदा लुटली तेव्हा परतीच्या प्रवासात महाराज गंभीरगडाजवळ आले होते. तेव्हा शत्रू पाठलागावर आला. जवळ असलेली संपत्ती घोडय़ांवर, खेचरांवर, बैलांवर लादलेली होती. त्यामुळे महाराजांना चटकन वेगाने हालचाल करता येईना, म्हणून महाराजांनी त्या संपत्तीचा काही भाग या विवरामध्ये टाकला [ संदर्भ हवा ] आणि त्या धोकादायक परिस्थितीमधून सहीसलामत निसटले. पुढे महाराजांना पुन्हा गंभीरगडावर येवून ती संपत्ती नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. या संपत्तीचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत अनेकांनी अयशस्वी प्रयत्न केले.
पोहोचण्याच्या वाटा :
१) आसलोन मार्गे :- मुंबई - पालघर मार्गे बोइसरला यावे. बोइसर वरुन एसटीने कासा गावात पोहचावे. कासागावातून ८ किमी अंतरावर आसलोन नावाचे गाव आहे. असलोन गावातून ३ कि.मी च्या कच्च्या रस्त्यावरुन पाटीलवाडीत दाखल व्हायचे. पाटीलवाडी हेच गंभीरगडाच्या पायथ्याचे गाव आहे गावाच्या बाहेरुन एक मळलेली वाट गडावर जाते. गावातून निघाल्यावर थोड्या वेळाने एक वाट गड थोडा डावीकडे ठेवून, उजवीकडच्या डोंगरसोंडेवरुन वर चढत जाते. दीड तासानंतर आपण गडाच्या पठारावर पोहोचतो. या पठारावरुन उजवीकडची वाट डोंगरसोंडेवरुन कातळकडा उजवीकडे ठेवून पायर्‍यांच्या साह्याने गडमाथ्यावर जाते.
१) कासा गाव मार्गे :-
१) कल्याण किंवा वाडामार्गे मनोर फाट्याला यावे. मनोर फाट्यावरुन अहमदाबादमार्गावरील चारोटी नाक्यावर उतरावे. चारोटीवरुन एक मार्ग अहमदाबादकडे तर दुसरा मार्ग जव्हारमार्गे नाशिककडे जातो. आपण नाशिकच्या मार्गावर २ किमी अंतरावर असणार्‍या कासांगावात उतरावे. या कासागावातून ८ किमी अंतरावर आसलोन नावाचे गाव आहे. पुढिल वाट वरील प्रमाणेच आहे.
राहाण्याची सोय :
गंभीरगडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
पाण्याचे टाके आहे, मात्र त्यामधून पाणी काढण्यास दोर आवश्यक आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पाटीलवाडीतून दोन तास लागतात.

No comments:

Post a Comment