Followers

Saturday 25 July 2020

चंदन-वंदन

चंदन-वंदन :
postsaambhar :yogesh bhorkar













चंदन - वंदन हा साताऱ्यातील एक जोडकिल्ला आहे. हा गिरीदुर्ग प्रकारातील असून याची उंची ३८०० फूट आहे. सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमूद आहे.

अ) चंदनगडावरील वास्तू व पहाण्यासारखी ठिकाणे :-
चंदनगडावर पंचलिंगी दोन शिवलिंगे असलेले महादेव मंदिर आहे. असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले. गडावर प्रवेश करतानाच राजा भोजाने उभारलेल्या दोन दगडी मनोरे आपले स्वागत करताना दिसतात. चंदनगडाच्या मध्यभागी एक पायापर्यंत बा़ंधलेला दगडी चौथरा आहे. गडाच्या नैर्ऋत्य बाजूस दारूगोळा कोठार आहे. गडाच्या वायव्येस एक बुरूज असून शेजारी एक शिवलिंग असलेली समाधी आढळते. तिच्यावर एका बाजूला मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे.

ब) वंदनगडावरील वास्तू व पहाण्यासारखी ठिकाणे :-
वंदनगडावर मराठा स्थापत्य शैलीतील एक प्रवेशद्वार आहे. त्यावर कीर्तिचक्र आणि गणेश प्रतिमा कोरलेली आढळते. या पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते. सध्या ते मातीत बुजले आहे. किल्ल्यावर भोजकालीन प्रवेशद्वार आहे. हे दार पन्हाळ्यावरील प्रवेशदाराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे.याच्यावर एक शिलालेख फारशी भाषेत तर दुसरा मोडी लिपीत आहे. यात यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख आढळतो. या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरुंग आहे. तुळाजी आंग्रेला येथेच कैद करून ठेवले असावे. गडाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला तटबंदीलगत खंदक आहे. महाराणी ताराबाईंनी हा बनवून घेऊन तब्बल दोन वर्ष शाहूशी लढाई केली होती. वंदनगडावर पायऱ्या असलेली पाच तळी होती. यापैकी एक बुजले असून चार तळी सुस्थितीत आहेत. गडाच्या पूर्वेस बालेकिल्ल्याच्या पायथ्याला छप्परी मंदिर आहे. हे महादेवाचे मंदिर आहे. गडाच्या वायव्येस काळूबाई मंदिर आहे. गडावर तीन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत. तीन दालने असलेले दारुगोळा कोठार गडाच्या मध्यभागी आहे. गडावर पुरातन राजवाडा आण़ि त्याचे अवशेष पहावयास मिळतात. गडावर एक टेकडी असून तिला बालेकिल्ला म्हणतात. यावर एका बुरुजाचे तसेच इमारतीचे अवशेष आहेत.तिथे जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या. गडाच्या पूर्वेस तसेच वायव्य दिशेस शेकडो पडक्या घरांचे अवशेष आढळतात. गडाच्या दक्षिणेस एक चोरवाट आहे. वंदनगडावर पूर्वेस एक आणि दक्षिणेस एक या प्रमाणे चाके नसलेल्या चुन्याची घाणी आहेत.

गडावरील रहाण्याची सोय :
वंदनगडावर सुमारे ५० ते १०० लोकांना राहता येते एवढी जागा आहे. गडावर खाण्याची सोय नाही. चंदनगडावर एक विहीर असून तिच्यातील पाणी जुलै ते फेब्रुवारीपर्यंत असते. वंदनगडावर ४ तळी असून पैकी तीन तळ्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे.

सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर असल्याने रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावागावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.
इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. सध्याच्या नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले १६४२ ला जिंकून स्वराजाची मुहुर्तमेढ रोवली. अफझलखान वधानंतर महाराजांनी साताराचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केले. व गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन वंदन अशी ठेवली.

No comments:

Post a Comment