Followers

Saturday 25 July 2020

★ तोरणा / प्रचंडगड – Torna Fort ★

#शिवकालीन_स्वराज्यातील_किल्ले_३



★ तोरणा / प्रचंडगड – Torna Fort ★

{ पुणे जिल्हा }...

किल्ल्याची उंची: ४६०५ फुट
चढाई श्रेणी: कठीण
जिल्हा: पुणे
तालुका: वेल्हे

तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. इतिहासामध्ये आपले आगळे वेगळे स्थान निर्माण करणारा तोरणा पुणे जिल्ह्यामधील वेल्हा तालुक्यात असून पूर्वी हा परिसर कानंद मावळ म्हणून ओळखला जात असे. या मावळातून कानंदी नावाची नदी वाहत असल्यामुळे या खोर्या ला कानंद मावळ असे नाव मिळाले. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत.
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला असून त्याच्या ताशीव अशा सरळसोट कातळ कड्यामुळे तो बेलाग झालेला आहे. त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते.
विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये तोरणा किल्ला होता. शिवरायांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ येथेच रोवली. या किल्ल्याचा ताबा घेतल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना मोहरांनी भरलेले हंडे शिवाजी महाराजांना मिळाले. या धनाचा वापर त्यांनी तोरण्याची दुरुस्ती आणि राजगड किल्ल्याच्या उभारणीसाठी केला. पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. औरंगजेब बादशहाला तोरणा किल्ला जिंकून घ्यावा लागला. कुठल्याही भेदनितीला तोरणा बळी पडला नाही. पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला.
वेल्हा गावाच्या पश्चिमेकडे तोरणा किल्ल्याचा एक डोंगरदांड आलेला आहे. या डोंगरदांडावरून गडावर जाणारी वाट आहे. या वाटेने साधारण दीड दोन तासामध्ये आपण तोरणागडावर पोहोचतो. वाटेमध्ये कोठेही पाणी नाही. या डोंगरदांडाने चढून आपण कातळकड्यांना भिडतो. कातळकड्यांमध्येच तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो. या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात. बिनीचा दरवाजा ओलांडून आपण पुढे गेल्यावर कोठीचा दरवाजा लागतो.
कोठीच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला तोरणाजाईचे मंदीर लागते. येथेच महाराजांना मोहरांचे हंडे सापडल्याच्या नेंदी आहेत. जवळच तोरण टाळे व खोकड टाके आहे. खोकड टाक्यामधील पाणी पिण्या योग्य आहे. या टाक्यापासून थोडे चढल्यावर आपण पोहोचतो ते बालेकिल्ल्यामध्ये. येथे मेंगाईदेवीचे देऊळ आहे. या मंदिराच्या परिसरामध्ये उध्वस्त झालेल्या वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. दिवाणघर आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पाहता येते. येथून एक वाट पूर्वेकडील बुरुजावर जाते. या बुरुजावरुन आसमंत उत्तमप्रकारे पाहता येतो. सिंहगड, पुरंदर, वज्रगड, राजगड, राहिडा, रायरेश्वर, महाबळेश्वर, प्रतापगड असा विस्तृत प्रदेश नजरेच्या टप्प्यामध्ये येतो.

बुरुजाच्याखाली निमुळत्या दांडावर बांधलेली झुंझारमाची अप्रतिम आहे. बुरुजाच्या डावीकडून माचीवर जाणारी अवघड वाट आहे. या वाटेवर सध्या एक लोखंडी शिडी बसवलेली आहे.
मेंगाई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर कड्यात मेंगाई नावाचे पाण्याचे टाके आहे. मंदिरापासूनच एक वाट कोकण दरवाजाकडे जाते. कोकणाच्या दिशेला असल्यामुळे या दरवाजाला कोकण दरवाजा असे नाव आहे. येथून बुधला माचीचे विलोभनीय असे दर्शन घडते. घसार्यााच्या या वाटेने जाताना कातळात खोदलेली पाण्याची टाकी लागतात. येथून एक वाट भगत दरवाजाकडे जाते, तर उजवीकडील वाट घोडजित टोकाकडे जाते. भगत दरवाजाकडील आणि उजवीकडील वाटेने आपल्याला राजगडाकडे जाता येते. उजवीकडील वाटेने गेल्यावर बुधल्याचा सुळका डावीकडे रहातो. हा सुळका चढण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. खाली डावीकडे बाळणजाई दरवाजा आहे. पुढे चित्ता दरवाजा कापूरलेणे व घोडेजिनचे टोक आहे.

तोरणा किल्ल्याबाबत असलेला महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हातमखानाचे पत्र. या पत्रातून तोरण्याचे जे वर्णन आले आहे ते मनोरंजक वाटेल. मोगलांनी तोरणा घेतल्यानंतर तोरण्यावर किल्लेदार म्हणून हातमखानाची नेमणूक करण्यात आली. त्याला किल्लेदारखान अशी पदवीही देण्यात आली. हातमखानाने आपला गुरू अताउल्ला याला लिहिले. त्याचा सारांश असा.
आता मी या किल्ल्याची हकीकत सांगतो. मी साहेबजाद्यांचा निरोप घेवून निघालो. मी दुर्गम मार्ग आणि संकटमय घाट पार करून तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. पायथ्यापासून टोकापर्यंत रस्ता काहीसा घोड्यावर बसून तर काहिसा पायी चालून पार करता येईल. यानंतर स्वारासाठी अगर पायी चालण्यासाठी वाट अशी नाही. किल्ल्याच्या एका बाजूला खोल दरी आहे. ती दरी म्हणजे अलफलुस्साफलीन (सप्त पाताळातील अगदी खालचा असलेला नरक) असे वाटते. किल्ल्यावर पुढे जाण्यास वाट नाही. येथे जाण्यास डोंगरात पायऱ्या काढल्या आहेत. त्याही अतिशय ओबडधोबड आहेत. धडधाकट, तरुण, मजबूत आणि चपळ माणसेही त्या पायऱ्या चढून जाईपर्यंत काकुळतीला येतात. मग माझ्यासारख्या दुबळ्या म्हाताऱ्याची काय कथा! या किल्ल्याची वाट अतिशय वेडीवाकडी आहे. हा किल्ला म्हणजे आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. अशा अवघड वेड्यावाकड्या वाटेने किल्ल्यावर कोणीही चढून दाखवा म्हणावे.
जॉन डग्लस या इंग्रजाने जेव्हा तोरण पाहिला त्यावेळी त्याने
Sinhgad is Lions Den, then Torana is Eagle’s Nest.
असे उद्गार काढले.

इतिहास
शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले.
तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांनंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता.

गडावर जाण्याच्या वाटा
तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. राजगड किल्ल्याकडून तसेच भट्टी या गावातूनही गड चढता येतो. परंतु वेल्हा येथून जाणे सोयीचे आहे.

गडापर्यंत जाण्याचे मार्ग
पुणे – शिवापूर – नसरापूर – वेल्हा (६० कि.मी.)
सातारा – शिरवळ – नसरापूर – वेल्हा (१०० कि.मी.)
मुंबई – पुणे – शिवापूर – वेल्हा (१९९ कि.मी.)

हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.....

लेखन /माहिती संकलन -: रमेश साहेबराव जाधव फोटो साभार -: १ अभिजीत सुर्यवंशी
२ महेश रमेश जाधव
३ अमोल तळेकर

No comments:

Post a Comment