Followers

Saturday 25 July 2020

प्रतापगड

साताऱ्याचे सात तारे : प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, वर्धनगड, वैराटगड व वसंतगड.
सातारा म्हणजे सात ताऱ्यांचा जिल्हा. सातारा जिल्ह्याला हे नाव पडले ते या जिल्ह्यामध्ये असलेल्या सात किल्ल्यांमुळे. प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, चंदन-वंदन, वर्धनगड, वैराटगड व वसंतगड हे किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये आहेत.

१) प्रतापगड :






















postsaambhar:yogesh bhorkar

साताऱ्यातील हा प्रसिद्ध डोगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०८१ मी. (३५५६ फूट) असून दोन्ही बाजूस २०० ते २५० मी खोल दरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यास १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग होतात.
दोन्ही भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज १० ते१५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझुल्या, रेडका, राजपहारा, केदार इ. बुरूजांचे अवशेष टिकून आहेत.
खालच्या मुख्य किल्ल्यात शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते स्थापिलेले तुळजा भवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. तिचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते.
१८२०साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी (कार. १८१८-३९) तेथे लाकडी मंडप बांधला. हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व मंदिरातील दागिन्यांची चोरी झाली. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरासही काही उपद्रव झाला.
प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व अफझलखान व छत्रपती शिवाजी महाराज भेट व त्या प्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (१६५९). छत्रपती राजाराम महाराज सुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. पेशवाईत नाना फडणीसांनी येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्या वेळी नाना फडणीसांविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले, तेव्हा नानांने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

गडावरील वास्तू :
किल्ल्यावर शिवरायांचा अश्वारूढ़ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला दुपदरी बांधणीचा यशवंत व रेडका बुरुज आहेत. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र, कडेलोट, सूर्य बुरुज इ. ठिकाणे आहेत. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफझुल्या बुरूजाच्या आग्नेयीस अफझलखानाची कबर आहे. तेथे दर वर्षी उरूस भरतो.
कुंभरोशी या महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील गावापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत १९५७ साली मोटार रस्ता करण्यात आला असून, तेथे एक धर्मशाळा आहे. दर वर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment